Devendra Fadnavis : पार्थ पवार जमीन घोटाळा आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; ‘प्राथमिक चौकशीचे आदेश’

Devendra Fadnavis On Parth Pawar : ‘अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करणार’; उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार नाहीत, फडणवीसांचा विश्वास
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे सुपुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याच्या गंभीर आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसCM Devendra Fadnavis यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतली आणि त्यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाच्या संदर्भात मी सर्व माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड संदर्भातील सर्व माहिती मी मागवली आहे. या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर मी शासनाची पुढची दिशा काय, या प्रकरणात काय कारवाई होणार, या सर्व गोष्टी सांगितल्या जातील.
या प्रकरणावर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही विश्वास व्यक्त केला. “उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील, असे माझे मत नाही. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अधिकची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यामुळे आता या जमीन घोटाळा प्रकरणाला कोणते वळण लागते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


