Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात दोन आरोपी अटकेत

सुषमा अंधारे यांचा संताप; “राजकीय पाठबळामुळेच उशिरा अटकेची कारवाई” महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका; “सरकार अॅक्शन मोडमध्ये उशिरा का?” असा सवाल
पुणे :- वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात अखेर मोठी कारवाई करत पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे साडेचारच्या सुमारास अटक केली आहे. मात्र ही अटक पोलिसांनी केली की आरोपी स्वतःहून हजर झाले, याबाबत संभ्रम कायम असून यामुळे प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय अधिकच गडद झाला आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर आणि महिला आयोगावर घणाघाती टीका केली. “जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील, तर त्यांना राजकीय पाठबळ आहे हे स्पष्ट होते,” असे त्या म्हणाल्या. अटक होण्यापूर्वी आरोपी एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता अॅक्शन मोडमध्ये आले असे महिला आयोग सांगतोय, पण वैष्णवीचा मृत्यू पाच दिवसांपूर्वी झाला, तेव्हा सरकार गप्प का होते?” त्यांनी सरकारच्या विलंबित प्रतिसादावरही नाराजी व्यक्त केली.
तसेच, अंधारे यांनी नाशिकच्या येवला तालुक्यातील भक्ती अथर्व गुजराती या तरुणीच्या आत्महत्येचा संदर्भ देत सांगितले की, “सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एक तरुणी जीव देते आणि आयोग अजूनही सुस्तच आहे. हा आयोग खरोखर महिलांसाठी काम करतोय का?”
या घडामोडींमुळे वैष्णवी हगवणे प्रकरण अधिकच गाजू लागले असून, राजकीय आणि सामाजिक स्तरावर संतापाची लाट पसरली आहे.



