
Bacchu Kadu Mahaelgar Tractor Morcha : ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ नागपूरच्या दिशेने रवाना; निर्णयाशिवाय माघार नाही, कडूंची आक्रमक भूमिका
नागपूर :- शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी आता थेट मैदानात उतरून लढा देण्याचा निर्धार केला आहे. या मागणीसाठी आज (मंगळवार, 28 ऑक्टोबर) त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ Maha Elgar Tractor Morcha राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यासह नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे.
सरकारी बैठकीवर बहिष्कार
या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची माहिती बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, “काल मुख्यमंत्री साहेबांशी (देवेंद्र फडणवीस) आमची मेसेजद्वारे चर्चा झाली. आम्ही त्यांना सांगितले की, आज आम्ही बैठकीला येऊ शकत नाही, कारण एक ते दीड लाख लोक नागपूरकडे येणार आहेत. आम्ही जर तिकडे गेलो तर इथले नेतृत्व कोण करणार?”
मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे सर्व मुद्दे मुख्यमंत्री आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहेत.
कडू म्हणाले, “हीच योग्य वेळ आहे. याशिवाय योग्य वेळ असू शकत नाही. चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने वाट बघत आहोत. सरकारने हे पुण्याचं काम पदरी घ्यावे. कारण आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.”
“चार-पाच वाजेनंतर रामगिरीवर कूच”
“आम्ही चार-पाच वाजेनंतर रामगिरी बंगल्यावर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) कूच करणार आहोत. प्रशासनाने आम्हाला अटकाव करू नये,” असा स्पष्ट इशाराही बच्चू कडू यांनी दिला. निर्णयाशिवाय मागे हटणार नसल्याचे ठामपणे सांगत त्यांनी मागणी केली की, सरकारने लेखी स्वरूपाचे निर्णय घ्यावेत आणि आवश्यक तिथे शासन निर्णय (GR) किंवा परिपत्रक काढावे.



