
Uddhav Thackeray On Mayuti Sarkar : देवेंद्र फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ठाकरेंची टीका; “तिन्ही पक्षांचा मालक एकच, महायुतीला ‘अॅनाकोंडा’ गिळल्याशिवाय राहणार नाही,” असा खोचक टोला
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 5 डिसेंबर 2025 रोजी सत्तेत एक वर्ष पूर्ण केले. मात्र, या वर्षभरात महायुतीतील अंतर्गत संघर्ष वाढला असतानाच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सरकारकडे थेट आणि मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे राजकीय टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे ठाकरे यांची मागणी?
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी महायुतीने अद्याप विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून, त्यांनी थेट आव्हान दिले आहे.
“विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद रद्द करा.”
ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, “महायुती सरकारने आता एक वर्ष होऊन गेल्यानंतरही दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेते दिलेले नाहीत. मग हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय? आता तरी सरकारने तात्काळ विरोधी पक्षनेते पद जाहीर केले पाहिजे.”
संविधानाचा दाखला
ठाकरे यांनी सरकारला कायद्यांचा दाखला देत उपमुख्यमंत्रिपदावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल, तर मग तुम्ही देखील उपमुख्यमंत्रिपद रद्द केले पाहिजे. कारण संविधानामध्ये उपमुख्यमंत्रिपदाबाबत कुठेही तरतूद नाही.”
‘अॅनाकोंडा’ची खोचक टीका
महायुतीतील वाढलेल्या संघर्षावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका केली.ते म्हणाले, “महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचे चिन्ह, नाव वेगवेगळं असले तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत.” त्यांनी काही दिवसांपूर्वी वापरलेला ‘अॅनाकोंडा’ हा शब्द पुन्हा वापरत इशारा दिला की, “आता या अॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही.”


