Uddhav Thackeray : “नुसती जमीन नाही, शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले!” कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

Uddhav Thackeray : पार्थ पवार जमीन घोटाळ्यावरून अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा; ‘शक्तीपीठ महामार्गाजवळच्या जमिनी दलालांच्या’
मराठवाडा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचा मराठवाडा दौरा आज तिसऱ्या दिवशीही सुरू असून, ते पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. कर्जमाफी आणि नुकसानीच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या जमीन खरेदी प्रकरणांवरून गंभीर आरोप केले.
शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवा
उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान किती मोठे आहे हे स्पष्ट केले. ते म्हणाले,”केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळाआपट करायची हा माझा उद्देश नाहीये. माझा पक्ष, चिन्ह चोरले गेले, मात्र माझी माणसं जाग्यावर आहेत. नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली नाही, तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. त्या वाहून गेलेल्या आयुष्याला आपण जर आता आधार दिला नाही तर मग पुढे काय करणार?”
जमीन घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा
यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याचा उल्लेख करत, सत्ताधारी नेत्यांकडून होणाऱ्या जमीन खरेदीवर गंभीर आरोप केले.
“अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढलंय अंबादासने. हे सर्व चक्र फार जास्त घाणेरडे आहे. महामार्गातील जमिनी कोण खरेदी करतंय बघा. शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारी कोण जमीन खरेदी करतंय हे देखील पाहा. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूच्या जमिनी दलालांच्या आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अगोदर हे तुमच्याकडून एकदम कमी भावाने जमीन घेणार आणि त्यानंतर या जमिनीची सोन्यापेक्षाही जास्त किंमत वाढेल. जमिनी सर्व हे ढापणार कारण यांना सर्व माहिती आहे की, कुठून काय जातंय.”
मुख्यमंत्र्यांच्या बिहार दौऱ्यावर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार निवडणुकीतील प्रचारावरून उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला. त्यांनी शिंदेंचा पुन्हा एकदा ‘नगरभकास मंत्री’ असा उल्लेख केला.
“शेतकरी टाहो फोडतायत आणि CM बिहारमध्ये आहेत. तिथे जाऊन म्हणतात ‘ये अंदर की बात है, बिहारवर PM च प्रेम आहे.’ इथे बहिणींना दीड हजार देऊन मत मिळवले आणि आता विसरले. बिहारमध्ये 10 हजार असं का? बँकेचा फायदा होऊ न देता कसा शेतकऱ्यांचा फायदा होईल ते CM ने सांगावे.”
कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कर्जमाफीच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला.
“मी माझे कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती केली होती, उपकार म्हणून नाही. आज तर मी कोणीही नाहीये. माझे वडील चोरले, पक्ष चोरले, सर्वकाही चोरले, माझी माणसे जाग्यावर आहेत, ती नाही तुम्ही चोरू शकत. माझं कर्तव्य आहे की, काहीही नसतानाही ही जी ताकद आहे, त्या ताकदीसाठी काम करणं. राज्यातील शेतकरी संकटात आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सत्ताधारी पक्षांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



