मुंबई

Uddhav Thackeray On PM Modi : पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण ‘त्या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत’; उद्धव ठाकरेंचा टोला

•‘मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते जरी मला शत्रू मानत असले तरी…’; शिवसेना खतम करण्याच्या राजकारणावर टीका

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यासोबतच त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपवर जोरदार टीकाही केली आहे. शिवसेना संपवण्याचे राजकारण कोणीही सहन करणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

‘मोदी माझे दुश्मन नाहीत’

मातोश्रीवर एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदी कोणी माझे दुश्मन नाहीत. मी त्यांना माझं दुश्मन मानत नाही. ते जरी मला शत्रू मानत असले, तरी मी त्यांना दुश्मन मानत नाही.” मात्र, यानंतर त्यांनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधला. “ते ज्या पद्धतीने शिवसेना खतम करायला निघाले आहेत, ते राजकारण कोणी सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप असले, तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा.”

‘घोषणेची भूत मानगुटीवर’

पंतप्रधान मोदींच्या भूतकाळातील घोषणांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टोला लगावला. ते म्हणाले, “भूतकाळात त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत.” यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट सिटी, 15 लाख खात्यात येणार, अच्छे दिन यांसारख्या घोषणांची आठवण करून दिली.

‘शिंदे गटातील नगरसेवक परत येणार?’

यावेळी पत्रकारांनी त्यांना धाराशिवमधील शिंदे गटाचे काही माजी नगरसेवक परत येण्यास इच्छुक असल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. “ते तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेलच,” असे म्हणत त्यांनी भविष्यात आणखी काही नेते आणि पदाधिकारी त्यांच्या गटात परत येण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0