“कारवाईत दुजाभाव नको, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ!” बोरीवलीत मराठी व्यापाऱ्यांवरील कारवाईवरून मनसे आक्रमक
•आर/मध्य प्रभाग कार्यालयावर मनसेची धडक; परप्रांतीय फेरीवाल्यांना संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप
मुंबई | बोरीवली आणि दहिसर परिसरात महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर जी कारवाई केली जात आहे, ती केवळ मराठी व्यापाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या संदर्भात मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी आर/मध्य प्रभागाच्या सहाय्यक अभियंता कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि निवेदन सादर केले.
मनसेचे प्रमुख आरोप
पक्षपाती कारवाई: परिसरात कारवाई करताना अधिकारी फक्त मराठी फेरीवाले आणि व्यापाऱ्यांचे सामान जप्त करत आहेत, तर परप्रांतीय फेरीवाल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
नियम सर्वांना समान असावेत : अतिक्रमण हटवताना नियम सर्वांसाठी सारखेच हवेत. एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून दुसऱ्याला संरक्षण देणे प्रशासनाला शोभत नाही.
अमराठी फेरीवाल्यांचे वर्चस्व: परप्रांतीय फेरीवाल्यांनी पदपथ व्यापलेले असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे नेत्यांनी विचारला.
प्रशासनाला इशारा
मनसे नेते कुणाल माईनकर आणि उपविभाग प्रमुख किरण नकाशे यांनी यावेळी प्रशासनाला सडेतोड शब्दांत सुनावले. “जर ही दुजाभावाची कारवाई थांबली नाही आणि सर्व अवैध फेरीवाल्यांवर समान पद्धतीने हातोडा पडला नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल,” असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



