Thane News : शिळ-डायघर पोलिसांची थरारक कारवाई! हत्येनंतर मित्राचे अपहरण करणाऱ्या आरोपींना 2 तासांत बेड्या; मृत्यूच्या दाढेतून तरुणाची सुटका

Thane Police Latest News : कारच्या डिपॉझिट रक्कमेवरून झाला होता वाद; धारदार चाकूने वार करून एकाचा खून, दुसऱ्याला संपवण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी आरोपींना गाठले
ठाणे/शिळफाटा | शिळफाटा परिसरात मोटार कारच्या पैशांच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करून त्याच्या मित्राचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या 2 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. “अभि इसका भी काम कर डालते हैं” म्हणत तक्रारदाराचा जीव घेण्याच्या उद्देशाने निघालेल्या आरोपींना देसाई गावातून ताब्यात घेऊन पोलिसांनी तक्रारदाराची सुखरूप सुटका केली. Thane Shilfata Police Latest News
नेमकी घटना काय?
तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख याने मुख्य आरोपी सैफअली खान याच्याकडून ‘व्हॅगनआर’ कार भाड्याने घेतली होती. कार परत दिल्यानंतर डिपॉझिटची रक्कम परत मागितली असता सैफअलीने टाळाटाळ केली. 29 जानेवारी रोजी दुपारी रिगल हॉटेलच्या बाजूला ही रक्कम देण्यासाठी सैफअलीने तक्रारदाराला बोलावले. तक्रारदार आपल्या अमन शेख, अबुतालीब आणि सचिन या मित्रांसह तिथे पोहोचला.
तेथे झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी आरिफ खान याने अमन शेखचे हात पाठीमागून धरले, तर सैफअली आणि शोएब खान यांनी अमनच्या छातीवर चाकूने जोरदार वार करून त्याची हत्या केली. मध्यस्थी करणाऱ्या अबुतालीबलाही जखमी करून आरोपींनी मुख्य तक्रारदार महमंद फैसल याचे बळजबरीने अपहरण केले.
पोलिसांचा चित्तथरारक पाठलाग
घटनेची माहिती मिळताच शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी तात्काळ दोन पथके रवाना केली. “आरोपी तक्रारदाराला मारण्याच्या बेतात आहेत,” ही माहिती मिळताच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. देसाई गाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी सैफअली निजामउद्दीन खान (29 वय), शोएब निजामउद्दीन खान (20 वय) आणि आरिफ आताउल खान (28 वय) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून महमंद फैसल याची सुखरूप सुटका केली आणि गुन्ह्यात वापरलेली कार व शस्त्रे जप्त केली.
कौतुकास्पद कामगिरी
पोलीस उप-आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक गजेंद्र राऊत आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. हत्येसारखा गंभीर गुन्हा घडून आरोपी पसार होण्यापूर्वीच आणि दुसऱ्याचा जीव जाण्याआधीच पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.



