Thane Dahi Handi 2025 : दहीहंडीच्या मंचावर आव्हाड आणि जाधव यांची ‘यारी’, ‘जय जय महाराष्ट्र’ गाण्यावर ठेका!

मनसेच्या दहीहंडीत जितेंद्र आव्हाडांची हजेरी, राज्यगीतावर नाचले गोविंदा, ‘दहीहंडीची पंढरी आणि विठ्ठल जितेंद्र आव्हाड’ अशी अविनाश जाधवांकडून स्तुती
ठाणे :- राजकारण बाजूला ठेवून मराठी सणांसाठी एकत्र आलेल्या मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मैत्रीची चर्चा ठाण्यात चांगलीच रंगली आहे. मनसेच्या ‘मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी विशेष उपस्थिती लावली आणि ‘जय जय महाराष्ट्र’ हे राज्यगीत गात उपस्थितांचा उत्साह वाढवला.
यावेळी, मंचावर जितेंद्र आव्हाड येताच मनसेचे अविनाश पानसे यांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आनंद दिघे यांनी या सणाला मोठे स्वरूप दिले आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हा सण जगभरात पोहोचवला.” त्यांनी स्पेनच्या गोविंदा पथकांना मुंबईत आणल्याचेही नमूद केले. या स्तुतीमुळे आव्हाड भारावून गेले. त्यांनी माईक हाती घेत डीजेला ‘जय जय महाराष्ट्र’ हे राज्यगीत लावण्यास सांगितले. “एकही हात खाली राहणार नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना मराठी माणसाची ताकद दाखवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाडांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “आज जुने दिवस आठवले, पक्ष, जात, धर्म विसरून इथे गोविंदा पथक येतात. मी त्यांच्यासाठी आलो. अविनाशने बोलावलं म्हणून आलो. इथे आल्यावर राज्यगीत गाऊन फ्लॅशबॅकमध्ये गेलो,” असे ते म्हणाले. दुसरीकडे अविनाश जाधवांनीही आव्हाडांचे तोंडभरून कौतुक केले. “ठाणे ही दहीहंडीची पंढरी आहे आणि या पंढरीचा विठ्ठल जितेंद्र आव्हाड आहे,” अशा शब्दांत त्यांनी आव्हाडांबद्दल आदर व्यक्त केला.



