
Mumbai Pune BMC Political News : एबी फॉर्ममधील तांत्रिक चुका आणि विलंबाचा बसला फटका; अनेक प्रभागांत ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाविनाच लढावे लागणार
मुंबई | महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज झालेल्या छाननी प्रक्रियेत राजकीय पक्षांना मोठे धक्के बसले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे ‘एबी फॉर्म’ बाद ठरवण्यात आले आहेत, तर मुंबईत भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव नाकारले गेले आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या 5 उमेदवारांच्या अर्जांवर ‘डिजिटल सही’वरून आक्षेप घेतल्याने त्यांची उमेदवारीही धोक्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला ‘एबी’
फॉर्म’चा फटका खासदार श्रीरंग बारणे यांच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच प्रभाग 24 मध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का बसला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचही उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ (AB Form) जमा झाले होते. यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो ग्राह्य धरला. यामुळे भाजपच्या 3 आणि शिंदे सेनेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाले आहेत. आता या उमेदवारांना अधिकृत चिन्हाऐवजी ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. परिणामी, प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकच उमेदवार असेल, तर शिंदे सेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढतील. उर्वरित 5 उमेदवारांसाठी पक्षाला स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असल्याने मोठी गोची झाली आहे.
मुंबईत भाजपचे दोन वॉर्डांत ‘बाय’
मुंबई महानगरपालिकेत भाजपने दोन जागांवर एकप्रकारे प्रतिस्पर्ध्यांना मोकळे रान दिले आहे. वॉर्ड 211 मध्ये भाजपचे शकील अन्सारी यांचा अर्ज कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे नाकारण्यात आला. तर वॉर्ड 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर या एबी फॉर्म मिळाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी अवघ्या 15 मिनिटे उशिरा पोहोचल्या. निवडणूक आयोगाने वेळेचे कारण देत त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. यामुळे या दोन वॉर्डांत भाजपचे अधिकृत चिन्ह नसेल, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाकरे गटाच्या 5 उमेदवारांवर शिंदे गटाचा आक्षेप मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभागात शिवसेना ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. प्रभाग क्रमांक 38,39,40,41 आणि 42 मधील ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर ‘डिजिटल सही’ असल्याचा दावा शिंदे गटाचे विभागप्रमुख वैभव भरडकर यांनी केला आहे. निवडणूक कार्यालयामध्ये छाननी दरम्यान हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिंदे गटाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नियमानुसार या अर्जांवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या 5 जागांवर ठाकरेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.


