Mumbai Rain Update : मुंबईत मिठी नदी धोकादायक पातळीवर, शेकडो कुटुंबांचे तातडीने स्थलांतर

Mumbai Mithi River latest News : क्रांती नगरमध्ये 140 झोपड्यांना धोका, रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले; नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर सुरू केले
मुंबई :- मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, ती धोकादायक पातळीच्या पलीकडे गेली आहे. मंगळवारी सकाळी नदीची पातळी 3.8 मीटर इतकी झाल्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलली असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. Mumbai Rain Latest News
क्रांती नगर, कपाडिया नगरमध्ये भीतीचे वातावरण
मिठी नदीतील पाण्याची पातळी 3.20 मीटर ओलांडताच कपाडिया नगरमधील झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पुराचा धोका लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. काहीजण नातेवाईकांच्या घरी गेले, तर काही जणांनी उंच इमारतींमध्ये आश्रय घेतला. मिठी नदीलगतच्या क्रांती नगरमधील सुमारे 140 झोपड्यांना धोका निर्माण झाला असून, त्यांना तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
300 नागरिकांचे स्थलांतर
मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा देत लोकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या भागात अंदाजे 200 ते 300 झोपड्या असल्यामुळे, प्रशासनाने पुढील बचावासाठी पूर्ण तयारी केली आहे आणि पाण्याच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.


