
Hingoli Politics Update : अमित शाहांकडे तक्रार दिल्यावरही कुरघोडी सुरूच; आमदार संतोष बांगर यांच्याकडून भाजपला मोठा स्थानिक धक्का
हिंगोली :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) जोरदार कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भाजपकडून शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांना पळवले जात असल्याची थेट तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्याकडे केली असतानाच, दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत शिवसेनेने भाजपला जोरदार झटका दिला आहे.
हिंगोली नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 16 ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी भास्कर बांगर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावत थेट शिवसेनेत प्रवेश दिला. भाजपच्या उमेदवारीतून माघार घेतलेल्या भास्कर बांगर यांनी आता शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीमधील तणाव अधिकच वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या पक्षांतराच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत यापुढे कोणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व उमेदवार घ्यायचे नाहीत, असे ठरल्याचे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.
मात्र, त्यानंतर लगेचच हिंगोलीत शिवसेनेने भाजपचा उमेदवार पळवल्यामुळे स्थानिक राजकारणातील ही कुरघोडी सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या या ‘पलटवार’नंतर भाजपचे नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


