Parliament Session Drama 2026 : संसदेत ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! 22 वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर; भाजपचा काँग्रेसवर ‘शारीरिक हल्ल्या’च्या कटाचा खळबळजनक आरोप

Parliament Session Today Update : पंतप्रधानांच्या खुर्चीला महिला खासदारांचा वेढा; ‘एपस्टीन फाईल्स’ आणि नरवणेंच्या पुस्तकावरून विरोधक आक्रमक, संसदेत सुरक्षेचा गंभीर प्रश्न
ANI | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण अपेक्षित असताना, विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांनी लोकसभेत भाषण न करण्याचा निर्णय घेतला. 22 वर्षांच्या संसदीय इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, आभार प्रस्ताव पंतप्रधानांच्या प्रतिसादाशिवाय (Reply) केवळ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. या घडामोडींमागे काँग्रेसचा पंतप्रधानांवर ‘शारीरिक हल्ला’ करण्याचा कट होता, असा खळबळजनक दावा लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी केला आहे.
काय घडले लोकसभेत? (5 फेब्रुवारी 2026)
पंतप्रधान भाषणासाठी येणार असताना, विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला आणि ट्रेझरी बेंचला (सत्ताधारी बाकांना) वेढा घातला. त्यांच्या हातात ‘Do What is Right’ असे फलक होते.
अध्यक्षांचा सल्ला: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि काही ‘अघटित’ घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींना सभागृहात न येण्याचा सल्ला दिला.पंतप्रधानांच्या अनुपस्थितीतच अध्यक्षांनी आभार प्रस्ताव पुकारला आणि विरोधकांच्या घोषणाबाजीतच तो मंजूर करण्यात आला.
महिला खासदारांचा ‘ढाल’ म्हणून वापर?
भाजप नेत्यांनी आणि सरकारी सूत्रांनी असा दावा केला आहे की, काँग्रेस खासदार पंतप्रधानांवर शारीरिक हल्ला करण्याची योजना आखत होते. “या योजनेसाठी महिला खासदारांना पुढे करून ढाल म्हणून वापरण्यात आले, जेणेकरून सुरक्षारक्षक त्यांना रोखू शकणार नाहीत,” असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी या घटनेचा निषेध करत याला “लोकशाहीचा काळा दिवस” म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रत्युत्तर: “पंतप्रधान घाबरले आहेत!”
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि प्रियांका गांधी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “आम्ही केवळ शांततापूर्ण निदर्शने करत होतो. पंतप्रधान आम्हाला आणि ‘एपस्टीन फाईल्स’ (Epstein Files) मधील मुद्द्यांना घाबरले आहेत का?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून सरकार पळ काढत असल्याची टीकाही त्यांनी केली.



