
Shivsena Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘अमूल्याग्र बदल’ होण्याची शक्यता; उद्धव ठाकरे गटाची ‘शेवटची आशा’.
मुंबई :- शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत (धनुष्यबाण) सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, उद्या (8 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी यावर निर्णय झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे अमूल्याग्र बदल होण्याची शक्यता आहे.
अंतिम सुनावणीकडे लक्ष
शिवसेना पक्षफुटीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात पक्षचिन्हाचा तिढा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातून फिरला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले आहे. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवल्यानंतर, आता पक्षचिन्हावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर राज्याचे पुढचे राजकारण अवलंबून असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही शेवटची आशा मानली जात आहे.
या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आणि नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
असीम सरोदे (उद्धव ठाकरे गटाचे वकील): “शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. दिनांक 8 ऑक्टोम्बर ला जस्टीस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे.
इकडे मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उदघाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? लवकरच कळेल.,”अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“राम आमच्याकडे, धनुष्यबाणही…”
गुलाबराव पाटील (शिंदे गटाचे मंत्री): राम आमच्याकडे आहे. त्यामुळे धनुष्यबाणही आमच्याकडेच राहील,” असा दावा त्यांनी केला.



