
Sanjay Raut On BJP Government : भाजपाची संविधान हत्या म्हणत टीका, तर राऊतांचा सवाल – संघाच्या बाळासाहेब देवरसांनी पाठिंबा दिला नव्हता का?
मुंबई | आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात पुन्हा एकदा इतिहासाचे वळण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. भाजपाने 25 जून 1975 या दिवसाला “संविधान हत्येचा दिवस” म्हणून निषेध नोंदवत जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत ‘अघोषित आणीबाणी चालूच आहे’; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात यांनी भाजपाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले, “भाजपाला नौटंकी करण्याची सवय लागली आहे. पुलवामा असो की पहलगाम, प्रत्येक गोष्टीचा उत्सव आणि राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आणीबाणीवर लेख लिहून भाजपने संविधानाचा अपमान केला आहे.”
राऊतांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाकडे लक्ष वेधत म्हटले की, “संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला खुला पाठिंबा दिला होता. त्यांचा इंदिरा गांधींशी झालेला पत्रव्यवहार आजही संग्रहीत आहे. त्यामुळे आज भाजप आणि संघाने तात्त्विक आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांचाही होता आणीबाणीला पाठिंबा”
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देताना राऊत म्हणाले, “बाळासाहेबांनी आणीबाणीला एक ‘शिस्त लावणारी व्यवस्था’ म्हणत समर्थन दिलं होतं. तेव्हा आज शिवसेना नाव घेणाऱ्यांनी याचं भान ठेवावं. भारतीय संविधानात अशा आणीबाणीची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती आणि ती घटनात्मकदृष्ट्या वैध होती.”
राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत दावा केला की, “गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. विरोधकांना बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकले जाते आहे, उद्योगपतींना लाभ मिळवून दिला जातो आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आता लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येणे गरजेचे आहे.”
आणीबाणीचा 50 वर्षांचा कालखंड पूर्ण होत असतानाच हा मुद्दा नव्या राजकीय संघर्षाचं कारण ठरत आहे. एकीकडे भाजपाने त्याचा वापर ‘आपातकालीन काळाची आठवण’ म्हणून केला आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी ‘सध्याच्या परिस्थितीत याच्याही पेक्षा गंभीर अघोषित आणीबाणी’ असल्याचा आरोप करत भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.


