
Kalyan MNS News : कौस्तुभ आणि कस्तुरी देसाईंनी सोडली ‘राज ठाकरे’ यांची साथ; माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या वाटेवर?
कल्याण | राज्याच्या राजकारणात सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र (KDMC) राजकीय ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शहरात पक्षांतराचे मोठे वारे वाहू लागले असून, एकाच वेळी मनसे आणि काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. मनसेचे दोन प्रमुख चेहरे कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.


मनसेला ‘देसाई’ दाम्पत्याचा धक्का
कल्याण पश्चिमेत मनसेची ताकद मानले जाणारे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी आपल्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, कौस्तुभ देसाई यांचे बंधू कल्पेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच ‘ठाकरे गटात’ प्रवेश केला होता. त्यामुळे आता हे दाम्पत्य देखील मशाल हाती घेणार की धनुष्यबाण? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.”राजीनामा दिला आहे हे खरं असलं, तरी पुढील राजकीय प्रवासाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही,” अशी सावध प्रतिक्रिया कौस्तुभ देसाई यांनी दिली आहे.
काँग्रेसलाही मोठे खिंडार
दुसरीकडे, कल्याणमध्ये काँग्रेसलाही मोठे भगदाड पडणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पोटे यांच्या जाण्यामुळे कल्याणमधील काँग्रेसची संघटनात्मक बांधणी खिळखिळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



