मुंबई

Mumbai Weather Update : मुंबई-ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’; पुढील 72 तास राज्यासाठी महत्त्वाचे!

• बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; शेतकरी पुन्हा संकटात

मुंबई :- बंगालच्या उपसागरात गुरुवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा सर्वाधिक फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या घाट परिसराला बसणार आहे.

मुंबई-ठाण्यासह रायगडला अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरातील सक्रिय चक्रीय स्थितीचा थेट परिणाम राज्याच्या किनारपट्टीवर होणार आहे. हवामान विभागाने शुक्रवार ते रविवार या कालावधीसाठी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा (Red Alert) इशारा दिला आहे.

गेले काही दिवस मुंबईत पाऊस नसल्यामुळे वाढलेल्या उकाड्याने त्रस्त नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्याला तसेच पुणे घाट परिसराला रविवारी सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. येथे दिवसभर संततधार पाऊस कोसळणार असून काही भागात कमी वेळेत अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली
आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असताना, पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने शेतीचे आणखी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार कोकण:
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र/मराठवाडा: पुणे (घाट परिसर), कोल्हापूर (घाट परिसर), सातारा (घाट परिसर), नांदेड, लातूर, धाराशिव
मेघगर्जनेसह पाऊस धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

मुसळधार पाऊस पालघर, नाशिक (घाट परिसर), अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली

विदर्भात सर्वाधिक तापमान;

मोसमी वाऱ्यांची माघार
राज्यात मोसमी वाऱ्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली असतानाही पावसाची शक्यता कायम आहे.

माघार प्रक्रिया: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण पश्चिम हिमालयीन प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली आहे.

तापमानाची स्थिती: विदर्भात मात्र पावसाच्या अंदाजानंतरही तापमानाचा पारा चढा होता. चंद्रपूर येथे सर्वाधिक 34.8अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला (33.2 अंश), अमरावती (33.8अंश), ब्रह्मपुरी (34.2अंश) आणि नागपूर येथेही 34.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

पावसाची तीव्रता वाढणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0