महाराष्ट्र
Trending

CM Devendra Fadnavis : ‘अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पूरस्थितीची माहिती, बचावकार्य वेगात

CM Devendra Fadnavis : बीड, धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन; एनडीआरएफच्या 17 तुकड्या कार्यरत

मुंबई :- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून, या पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. बीड, अहिल्यानगर, सोलापूर आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

बचावकार्याला वेग

राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस झाला असून, काही भागांत पूरस्थितीमुळे अनेक लोक अडकले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बीड आणि धाराशिव येथे बचावकार्य वेगाने सुरू आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने 27 लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून, जवळपास 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या कार्यरत

सध्याच्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि एसडीआरएफच्या (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) 17 तुकड्या राज्यातील वेगवेगळ्या भागात काम करत आहेत. या तुकड्या मदत आणि बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांचे पावसाने मोठे नुकसान झाले असून, त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी आपण नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आता जसे जसे पंचनामे येतील, तशी तशी मदत केली जाईल.” आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या घोषणेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0