
Bala Nandgaonkar On BMC Election : ‘राजगड’वरून मिळणार उमेदवारांना अधिकृत पत्र; ठाकरे बंधूंच्या युतीचा धर्म पाळण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई | “मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि ती मराठी माणसाचीच राहिली पाहिजे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कारस्थान रचले जात असून, अशा लोकांची स्वप्ने उद्ध्वस्त करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे,” अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मनसेच्या उमेदवारांना ‘राजगड’ या मुख्य कार्यालयातून एबी फॉर्म (AB Form) दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
युतीचा धर्म आणि अस्तित्वाची लढाई
ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर भाष्य करताना नांदगावकर म्हणाले, “गेल्या 20 वर्षांत आम्ही पहिल्यांदाच युतीमध्ये निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळणे आवश्यक आहे. जिथे शिवसेना (UBT) किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा उमेदवार असेल, तिथे मनसे कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे. काही जागा इकडे-तिकडे झाल्या तरी चालेल, पण मुंबई हातातून जाता कामा नये.”
‘राजगड’वरून एबी फॉर्मचे वाटप
मनसे नेमक्या किती जागा लढवणार, या प्रश्नावर नांदगावकरांनी थेट आकडा सांगितला नसला तरी, एबी फॉर्म दिल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे नमूद केले. “आतापर्यंत आम्ही स्वबळावर लढलो आहोत, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांनी नाराज होऊ नये, कारण ठाकरे बंधूंचे भविष्य उज्ज्वल आहे आणि अशा अनेक निवडणुका पुढे येत राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत समन्वय
या निवडणुकीत शरद पवार गटही सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. “राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आपल्या सोबत आहेत. त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरतानाही मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे आणि प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश राज ठाकरेंनी कोअर कमिटीला दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई वाचवणे हेच ‘टार्गेट’
बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना जोशात काम करण्याचे आवाहन केले. “मुंबईत सत्ता राखणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक भांडणे आणि वाद बाजूला सारून मराठी माणसाच्या या अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.


