
Maharashtra Breaking News : आज संध्याकाळी 5 वाजता राजभवनवर शपथविधी सोहळा; शरद पवारांकडून पुतण्याच्या आठवणींना उजाळा आणि राजकीय भूमिकेवर स्पष्टीकरण
मुंबई | अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) धुरा आता सुनेत्रा वहिनींकडे सोपवण्यात आली आहे.सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याचा बहुमान मिळणार आहे. शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. जयंत पाटील आणि स्वतः अजित पवार या चर्चेचे नेतृत्व करत होते. 12 डिसेंबर ही तारीख स्वतः अजितदादांनीच विलीनीकरणासाठी निश्चित केली होती,” असा खळबळजनक खुलासा शरद पवारांनी केला. अजितदादांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमचीही इच्छा असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
“परिवार पाठीशी, पण राजकारण वेगळं”
सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “अजित पक्ष सांभाळत होता, तो गेल्यानंतर कोणीतरी पुढे येणे आवश्यक होते. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आणि अधिकार आहे. परिवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पण राजकारण वेगळं आहे.” अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना ते म्हणाले की, “अजित पहाटेपासून कामाला लागायचा, आज तो असता तर घरी नाही तर ‘फिल्ड’वर दिसला असता.”


