Raj Thackeray : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरे यांचे सडेतोड विधान, ‘गोळीबार करताना ते धर्म विचारत होते, सरकारला फक्त एकदाच इशारा द्यावा…’

•जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल राज ठाकरे म्हणाले आहेत की, जर या देशातील आमच्या हिंदूंवर कोणी हल्ला केला तर आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊन त्यांच्या विरोधात उभे राहू.
मुंबई :- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध केला आहे.राज ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘मनसेच्या वतीने या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि या कठीण काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली…
ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…
केंद्र सरकारने काश्मीरमधून 370 कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….
हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.



