
Sanjay Raut On Election Commission : शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीला
मुंबई :- शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आज (मंगळवार, 15 ऑक्टोबर) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे. निवडणूक आयोगाची Election Commission पूर्णपणे जोकरगिरी सुरू आहे,” असे विधान करत, मुंबई आणि ठाण्यासह नाशिकमध्ये लाखो बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बोगस मतदारांचे पुरावे सादर करणार
आज राज्यातील प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे नेते यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. या भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले.
बोगस मतदारांचा आरोप: “मुंबई आणि ठाण्यामध्ये बोगस मतदार आहेत. नाशिकमध्ये साडे तीन लाख मते बोगस आहेत. विधानसभेला आम्हाला याचा फटका बसला, आता महापालिकेला याचा फटका बसू नये, यासाठी आम्ही भेट घेत आहोत. मते कशी वाढतात, हे आम्ही त्यांना (निवडणूक आयोगाला) दाखवणार आहोत.”
VVPAT चा प्रश्न: मुंबई महापालिकेत VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) का नाही, असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी यावरूनही गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरेंच्या सहभागावर भाष्य
राज ठाकरे महाविकास आघाडीत येऊ शकतात का, या प्रश्नावर राऊत यांनी ‘हा प्रश्न राज ठाकरेंना विचारावा’ असे सांगितले. मात्र, त्यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) अनेक मुद्द्यांवर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले.
‘मिंदे-अजित पवारांच्या पक्षाला मानत नाही’
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांवर निशाणा साधला. “मिंदेंचा पक्ष (शिंदे गट) आणि अजित पवारांचा पक्ष आम्ही मानतच नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी दोन्ही पक्षांना लक्ष्य केले.
निवडणूक आयोगाने या गंभीर आरोपांची आणि शिष्टमंडळाने दिलेल्या पुराव्यांची किती दखल घ्यावी, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.


