
Mumbai Political Latest News : घराणेशाही अन् पराभवाचा फटका; नगरसेवक फुटीच्या भीतीने मुंबईत हालचालींना वेग, ‘गट’ स्थापनेसाठी जोरदार फिल्डिंग
मुंबई l राज्यातील 29 जिल्ह्यांच्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षात मोठी ‘भाकरी’ फिरवण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व राखले असले तरी, इतर जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांनी आणि आमदारांनी सोपवलेली जबाबदारी चोख न पाळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून नव्या आणि तडफदार चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत शिंदे असून, निवडणुकीपूर्वी दिलेला ‘लिटमस टेस्ट’चा इशारा आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. Mumbai BMC Latest News
या निवडणुकीत पक्षाला बसलेल्या फटक्यामागे ‘घराणेशाही’ हे महत्त्वाचे कारण ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. सदा सरवणकर, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि अशोक पाटील यांसारख्या बड्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकिटे खेचून आणली, मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. दुसरीकडे, भाजपने मेरिटवर जागावाटप करून शिवसेनेला 90 जागांवर मर्यादित ठेवले, ज्याचा मोठा फटका मुंबईत बसल्याचे बोलले जात आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत.
या राजकीय धामधुमीत मुंबईतील नगरसेवकांची फाटाफूट रोखण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी मैदानात उतरून ‘कदम’ टाकले आहेत. नगरसेवकांचा स्वतंत्र ‘गट’ स्थापन करण्यासाठी आज कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, गट नेतेपदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी नावांची चर्चा आहे. ही तटबंदी मजबूत करून आगामी काळात पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. एकूणच, या निकालांनी राज्यातील सत्तेची समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक बदलांचे वादळ धडकण्याची दाट शक्यता आहे.


