Nana Patole : “ऑपरेशन सिंदूरवरून वादळ” – नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले!

• “देशाच्या वीर जवानांचा अपमान, काँग्रेसची मानसिकता उघडी पडली” – बावनकुळे यांचा घणाघात
मुंबई | काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला त्यांनी “लहान मुलांचा व्हिडीओ गेम” असे संबोधले आणि या मोहिमेबाबत केंद्र सरकारने पाकिस्तानला आगाऊ इशारा दिल्याचा दावाही केला. यामुळे भाजपकडून जोरदार टीका होत असून, या वक्तव्यामुळे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाना पटोले म्हणाले, “भारताने पाकिस्तानला आधीच लक्ष्यस्थळं कळवली होती. त्यामुळे तिथे कुणीच राहिलं नाही. ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यावर ही मोहीम थांबवण्यात आली. हे ऑपरेशन म्हणजे एखादा गेम होता.”
यावर भाजपचे नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?
नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे!
देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधी ही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या!
नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.


