
लोकमान्य’ टिळक: ज्यांनी गणेशोत्सव-शिवजयंतीतून लोकांना जोडले, ब्रिटिशांना हादरवले!
पुणे: “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” ही नुसती घोषणा नव्हती, तर ती करोडो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचा निखारा पेटवणारी सिंहगर्जना होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक Bal Gangadhar Tilak यांनी ब्रिटिश सत्तेला हेच आव्हान दिले. आज, 1 ऑगस्ट, या महान नेत्याची पुण्यतिथी. टिळक म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार, एक चळवळ आणि राष्ट्राला एकत्र आणणारी एक महान शक्ती होती.
टिळकांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखले होते की केवळ राजकीय चळवळीतून स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यासाठी जनतेला एकत्र आणावे लागेल, त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना जागवावी लागेल. याच विचारातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे उत्सव सुरू केले. या उत्सवांनी जाती-धर्माच्या भिंती तोडून लोकांना एका छताखाली आणले आणि स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी एकत्र उभे राहण्याची प्रेरणा दिली.
‘केसरी’ची डरकाळी आणि ‘गीतारहस्या’ची ज्ञानगंगा
टिळकांची लेखणी म्हणजे तलवारीपेक्षाही धारदार शस्त्र होते. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून त्यांनी ब्रिटिश राजवटीवर जोरदार टीका केली. त्यांच्या ज्वलंत विचारांनी ब्रिटिश सरकार हादरून गेले. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून ब्रिटिशांनी त्यांना याच कारणामुळे संबोधले. मंडालेच्या तुरुंगात असतानाही त्यांचे मन शांत बसले नाही. त्यांनी ‘गीतारहस्य’सारखा महान ग्रंथ लिहून जगाला कर्मयोगाचे महत्त्व पटवून दिले.
आज त्यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदरांजली वाहणे नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शपथ घेणे होय. लोकमान्य टिळक यांनी दिलेला राष्ट्रवाद, सामाजिक एकोपा आणि स्वराज्य मिळवण्याचा ध्यास हा आजही आपल्याला प्रेरणा देतो.



