
Maratha Military Landscapes of India : महाराष्ट्रातील 11 ऐतिहासिक किल्ले आणि तामिळनाडूमधील गिंगी किल्ला मिळाले ऐतिहासिक स्थान
मुंबई | भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया’ या भारत सरकारच्या 2024-25च्या अधिकृत नामांकनाला यूनेस्कोच्या 47व्या बैठकीत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. Maratha Military Landscapes of India या निर्णयामुळे भारताची जागतिक वारसा यादीतील ही 44वी संपत्ती ठरली असून, देशाच्या स्थापत्य, लष्करी डावपेच, आणि सांस्कृतिक परंपरेचा हा अभिमानास्पद ठसा जागतिक स्तरावर अधोरेखित झाला आहे.
या यादीत महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, लोहगड, विजयदुर्ग, राजगड, खंडेरी आणि साल्हेर तसेच तामिळनाडूमधील गिंगी किल्ला यांचा समावेश आहे. काही किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ASI) अधिपत्याखाली असून, उर्वरित महाराष्ट्र शासनाच्या संग्रहालय व पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहेत.
हे किल्ले तटीय भागांपासून उंच डोंगररांगांमध्ये वसलेले असून, मराठा साम्राज्याच्या सामरिक दूरदृष्टीची आणि किल्ले स्थापनेतील प्रावीण्याची साक्ष देतात. या किल्ल्यांचे स्थान, रचना आणि एकमेकांशी असलेला समन्वय यावरून त्या काळातील रणनीतीबद्ध सुरक्षा व्यवस्थेचा आणि स्थापत्य कौशल्याचा उत्कृष्ट नमुना समोर येतो.
या मान्यतेसाठी भारताने जानेवारी 2024 मध्ये यूनेस्कोकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 18 महिन्यांच्या विस्तृत मूल्यांकन प्रक्रियेत ICOM तज्ज्ञांचे दौरे, तांत्रिक बैठकांचे आयोजन आणि किल्ल्यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. अखेर 11 जुलै रोजी पॅरिस येथील यूनेस्को मुख्यालयात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत 20 सदस्य देशांपैकी 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला समर्थन दिले. 59 मिनिटांपर्यंत झालेल्या चर्चेनंतर प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर यूनेस्को, वर्ल्ड हेरिटेज सेंटर, आणि सल्लागार संस्थांनी भारताचे अभिनंदन केले.
या गौरवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून, देशभरातून समाधान व्यक्त होत आहे. हा निर्णय केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या समृद्ध वारशासाठी एक मोलाचा टप्पा ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
ऐतिहासिक !….अभिमानास्पद !!!…गौरवशाली क्षण !!!…
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना…..महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!!…..महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले.सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥


