
Uddhav And Raj Thackeray : “मी आणि राज, तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र आलो”; मतचोरी करणाऱ्यांना ‘टाळक्यात मूठ’ हाणण्याचा इशारा
मुंबई :- मतदार याद्यांमधील गैरव्यवहाराविरोधात आज (1 नोव्हेंबर) मुंबईत निघालेल्या ‘सत्याच्या मोर्चा’मध्ये राज्याचे लक्ष वेधून घेणारा क्षण पाहायला मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर प्रथमच विरोधी पक्षांना एकत्रित आणणारे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले आणि एकत्र येऊन भाषणे केली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक विधान केले, ज्याला राजकीय वर्तुळात युतीची अप्रत्यक्ष घोषणा मानले जात आहे.
उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
उद्धव ठाकरे यांनी सभेत हजारोंच्या जनसमुदायासमोर स्पष्ट केले की, ठाकरे बंधू एकत्र का आले आहेत. ते म्हणाले,”मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे.”
युतीची घोषणा आणि इशारा
उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना हाताची मूठ वळवून मतचोराच्या राजाकडे (बादशाहकडे) पाठवण्याचा संदेश दिला. “हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. 5 जुलैपासून ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी सुरू होत्या, मात्र आज उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे कारण स्पष्ट करून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीची घोषणाच केल्याचे मानले जात आहे.
निवडणूक आयोगाला न्यायालयात आव्हान
मतचोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाविरोधात आम्ही मोठं पाऊल उचलणार आहोत. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत. येत्या काही दिवसात आपण न्यायालयात जाणार आहोत.”
सर्व पुरावे दिल्यानंतर न्यायालयात न्याय मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच, “न्याय न मिळाल्यास जनतेचं न्यायालय निर्णय घ्यायला तयार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, लोकांना ‘चोर दिसला की लोकशाही मार्गाने फटकवा’, कायदा हातात घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.


