
Mahaparinirvan Diwas : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा निर्मितीसाठी समन्वय समिती स्थापन होणार; वाहतुकीचे नियोजन व मूलभूत सुविधांवर भर
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvan Diwas चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दिले आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चैत्यभूमीवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात आलेल्या विविध सूचनांचा विचार करून लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर सर्व आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे.
याशिवाय, अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावण्यात यावेत आणि नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी बेस्ट (BEST) तर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या बैठकांमुळे मूलभूत बाबींवर लक्ष देता येते आणि काही उणिवा राहिल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेले ज्ञान आणि जागरूकता अधिक बळकट करत त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


