
Dombivli Suresh Bhoir News : निष्ठावंतांना डावलल्याने नाराजी; शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप सोडली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश
कल्याण-डोंबिवली :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये (महायुती आणि महाविकास आघाडी) नेते-कार्यकर्ते परस्परविरोधी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याने मोठा राजकीय राडा सुरू आहे. महायुतीत तर यावरून थेट मंत्रिमंडळ बैठकांवर बहिष्कार टाकण्यापर्यंत नाराजी पोहोचली होती.
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने बहुतांश लोकांचा ओढा भाजपकडे असला तरी, आता कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक आणि टिटवाळा परिसरातील जनसंपर्कासाठी ओळख असलेले सुरेश भोईर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचा राजीनामा दिला असून, थोड्याच वेळात ते मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करणार आहेत.
भोईर यांच्या नाराजीचे कारण
सुरेश भोईर यांनी भाजप सोडण्यामागे स्थानिक नेतृत्वाची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि पक्षाचा राजीनामा दिला.
राज्यात दोन्ही शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट) तसेच भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात परस्परविरोधी नेत्यांना प्रवेश न देण्याचे ‘वरिष्ठ पातळीवर’ ठरले असले तरी, स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे कार्यकर्ते आपले पक्ष बदलत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरेश भोईर यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.या प्रवेशानंतर भाजपचे स्थानिक नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



