Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा मागितला, पण माझा पक्ष फोडला’;उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : ‘आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना संविधानाचे ज्ञान’; ‘इंडिया’ आघाडी एकदिलाने लढणार
मुंबई :- ‘इंडिया’ आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, “आधीचे उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देऊन गायब झाले, त्यामुळे ही निवडणूक होत आहे. ‘इंडिया’ आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने ही निवडणूक लढत आहोत. आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे. आता देशाला सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेऊन आणि न्यायबुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती पाहिजे आहेत.”
‘माझा पक्ष चोरला, तरीही पाठिंबा पाहिजे’
उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता, या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट खरी आहे. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले, माझा पक्ष चोरला, तो फोडला, त्यांच्यासमोर माझे उमेदवार निवडून आणले, तरीही त्यांना माझा पाठिंबा हवा आहे. या विनंतीला काय अर्थ आहे? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी न मागता पाठिंबा दिला होता. ‘गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या,’ या पद्धतीला नाकारले पाहिजे.”
‘संख्याबळावर निवडणूक अवलंबून नाही’
‘इंडिया’ आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “संख्याबळावरच निवडणूक अवलंबून असती, तर निवडणूक घेण्यात अर्थ नाही. मतदान गुप्त असते. ज्यांच्या हृदयात छुप्या पद्धतीने देशप्रेम आहे, असे एनडीएचे खासदार देशासाठी मतदान करू शकतात. देश विचित्र परिस्थितीत नेला जातोय, त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी आपण त्याला थोपवू शकतो आणि आपली लोकशाही वाचवू शकतो. गुलामगिरीत देश जाणार नाही.”


