Aus vs Ind 2nd T-20 : मेलबर्न टी-20: भारतीय फलंदाजांची निराशा; ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

•भारताचा डाव 125 धावांवर आटोपला; अभिषेक शर्माचे अर्धशतक व्यर्थ, ऑस्ट्रेलियाच्या मार्शची 46 धावांची खेळी
Aus vs Ind 2nd T-20 :- भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने तो रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव केवळ 125 धावांवर आटोपला. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 68 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला हर्षित राणाने 35 धावा करून चांगली साथ दिली. मात्र, या दोघांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही, ज्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचा सोपा विजय
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 126 धावा करण्याचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 गडी राखून सहज जिंकला.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 28 धावांचे योगदान दिले, तर जोश इंगलीसने 20 धावा केल्या.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.



