Kalyan Dombivli Meat Ban : 15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीत मांसविक्री बंदी; राजकीय वाद पेटला

•महापालिकेच्या आदेशामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी; ‘लोकांनी काय खावे, हे ठरवणारे पालिका अधिकारी कोण?’ असा सवाल
कल्याण :- स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1988 च्या एका जुन्या ठरावाच्या आधारे घेण्यात आलेल्या या आदेशामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, राजकीय वर्तुळातही वादंग निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर आक्षेप घेत, “सर्व प्रकारचे वाद पेटवून झाले आहेत, आता राहिलेला शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद पेटविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का?” असा संतप्त सवाल केला. “लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणारे महापालिका अधिकारी कोण?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याचबरोबर, आदित्य ठाकरे यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष न देता महापालिका आयुक्त लोकांना काय खावे हे सांगत असतील, तर त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. एक दिवस शाकाहार पाळण्यास काहीच हरकत नाही, असे सांगत विरोधकांचे काम केवळ टीका करणे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आदेशात नेमके काय?
महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी 19 डिसेंबर 1988 च्या प्रशासकीय ठरावाचा (क्रमांक 750) आधार घेऊन हा आदेश काढला आहे. त्यानुसार, 14 ऑगस्टच्या रात्री 12 पासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, 36 वर्षांपूर्वीच्या या ठरावाचा आता वापर केल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे.


