
Mumbai Latest Accident News : पवईतील जेव्हीएलआर रस्त्यावर जीवघेणा खड्डा ठरला काळ; कुटुंबियांनी पालिकेला धरले जबाबदार
मुंबई :- मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांसाठी किती जीवघेणे ठरू शकतात, याचा थरारक प्रत्यय शनिवारी (26 जुलै ) पवईतील जोगेश्वरी लिंक जोड रस्त्यावर (जेव्हीएलआर) आला. एका खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार लालू कांबळे (वय 59) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मुंबईच्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
अंधेरी येथील महाकाली लेणी परिसरात राहणारे लालू कांबळे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून (एमएच-2 जीजी 5436) पवईतील जोगेश्वरी-विक्रोळी रस्त्यावरून विक्रोळीच्या दिशेने जात होते. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एनटीपीसी सिग्नलजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (चालक साजिद शेख, 25 वय) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कांबळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी दोन मोठे खड्डे आहेत. कांबळे यांची दुचाकी एका खड्ड्यात गेल्याने तिचा वेग मंदावला आणि त्याच क्षणी मागून आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली.
लालू कांबळे यांच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा सचिन कांबळे (वय 32) याने तीव्र संताप व्यक्त करत, “माझ्या वडिलांचा मृत्यू खड्ड्यांमुळेच झाला आहे आणि या दुर्घटनेला मुंबई महापालिकाच जबाबदार आहे,” असा गंभीर आरोप केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
अपघातानंतर गस्तीवरील पोलिसांनी डंपर चालक साजिद शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत भरधाव वेगाने वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


