Radhakrishna Vikhepatil : “आधी कर्जबाजारी व्हा, मग कर्जमाफी मागा!” जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त विधान

•शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह; महायुतीतील नेत्यांकडून बेताल विधानांची मालिका सुरूच; बावनकुळेंकडून बचावाचा प्रयत्न
अहमदनगर :- राज्यात महायुती सरकारमधील मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सातत्याने बेताल वक्तव्ये केली जात असताना, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता त्यात आणखी एक वादग्रस्त विधान जोडले आहे. “आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,” असे विधान विखे पाटील यांनी केले आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विखे पाटील यांनी ‘सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची,’ हे चक्र अनेक वर्षांपासून चालू असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीकेचा प्रहार झाला आहे.
बावनकुळेंकडून सारवासारव
या बेताल विधानानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले. त्यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज 100 टक्के माफ करणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांवर परत कर्ज होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
शेतकरी नेत्यांचा संताप
विखे पाटील यांच्या वक्तव्याचा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी चांगलाच समाचार घेतला. नवले म्हणाले की, विखे पाटील यांनी शेतकऱ्यांनाच दोषी ठरवण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकारी धोरणांमुळे होत आहे. लुटीची धोरणे राबवायची आणि महागाईच्या नावाखाली भाव पाडायचे, पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे हे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले. तसेच, निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची आश्वासने देणाऱ्या नेत्यांनी आता मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनांनाच प्रताडित केल्यास तीव्र प्रतिकार करू, असा इशाराही नवले यांनी दिला आहे.



