Maharashtra Politics : “फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा – शेतकरी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय!”

नोंदणी फी माफ, अंशकालीन शिक्षकांना संधी, हातमाग कर्मचाऱ्यांना थकबाकी – मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे ठोस निर्णय
मुंबई : आजची मंत्रिमंडळ बैठक ठरली ‘जनतेच्या अपेक्षांची पूर्तता’ करणारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत, शेतकरी, शिक्षक, कामगार, अधिकारी अशा अनेक घटकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी दिलासा – ‘नोंदणी फी’ आता शून्य!
शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी लागणारी नोंदणी फी आता शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत – आर्थिक ओझ्याखाली दबललेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक घोषणा.
शाळांना मिळणार नवे बळ – अंशकालीन निदेशक धोरणात सुधारणा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसाठी नवीन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील आणि शाळांमध्ये व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.
हातमाग कामगारांना न्याय – थकबाकी मंजूर
नागपूर येथील हातमाग महामंडळाच्या 195 कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून थांबलेली मागणी पूर्ण झाली असून, कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे.
मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय:
- वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान: इचलकरंजीला 657 कोटी आणि जालन्याला 392 कोटींचे पाच वर्षांत अनुदान मंजूर.
- न्यायालयीन यंत्रणेसाठी भर: मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार टंकलेखक पदे निर्माण.
- “मॅग्नेट” प्रकल्पासाठी नवे नेतृत्व:* पणन मंत्री असतील संस्थेचे अध्यक्ष.
- FDCM मध्ये सुधारणा: 1,351 पदांचा आकृतीबंध मंजूर.
- कृषि अधिकाऱ्यांची पदनामे बदलून सन्मान: “उप कृषि अधिकारी” आणि “सहायक कृषि अधिकारी”.
- सामाजिक विकासासाठी मान्यता: सुहित जीवन ट्रस्टच्या कार्यशाळेला मान्यता.
- पत्रकार क्लब ऑफ नागपूरसाठी अटींमध्ये बदल.


