
कळंबोली पोलिसांकडून शोध सुरू
कळंबोली :- नवी मुंबई पनवेलच्या कळंबोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडताजि पिराजी राजपुत-पडयार (वय ३७) हे १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ‘नाश्ता करून येतो’ असे सांगून घराबाहेर पडले, मात्र ते अद्यापही परतले नाहीत. त्यांचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे, तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरातून हडताजि बेपत्ता झाले आहेत. मूळचे गुजरातचे रहिवासी असलेले हडताजि सध्या पुण्यातील देहुरोड येथे वास्तव्यास होते. बेपत्ता होताना त्यांनी पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्यांचे भाऊ नारायणसिंग राजपुत यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “ते नेहमी वेळेवर घरी परतायचे, पण यावेळी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही,” असे त्यांनी सांगितले.
कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंग (रजिस्टर क्र. ४१/२०२५) अंतर्गत या प्रकरणाची नोंद झाली आहे. तपास अधिकारी स्वाती नेताम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, हडताजि यांच्या फोनच्या लोकेशनचाही शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हडताजि यांच्याबद्दल काहीही माहिती असल्यास, नागरिकांनी तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हडताजि यांचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असून, त्यांच्या शोधासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. हा रहस्यमय प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बेपत्ता व्यक्तीचा शोध लागेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


