
Devendra Fadnavis On Maharashtra Election : “घोषित निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही”; ‘कायद्याचा चुकीचा अर्थ लावला गेला’, देवेंद्र फडणवीस यांचे परखड मत
मुंबई :- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल स्वीकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची प्रक्रिया आणि कायद्याच्या अर्थबोधनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे 24 नगरपरिषदा आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी होणारे मतदान 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहे, त्यामुळे दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. Maharashtra Local Body Election
मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर बोलताना अनेक वर्षांचा अनुभव नमूद केला.
“मी अजून निकाल वाचलेला नाही, पण खंडपीठाने दिलेला निकाल सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मागचे 25 ते 30 वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतं आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धती आहे, ती योग्य वाटत नाही.”
त्यांनी यंत्रणेच्या चुकांमुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होत असल्याकडे लक्ष वेधले. “खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही, हे निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे.”
फडणवीस यांनी कायद्याच्या अर्थबोधनावर थेट आक्षेप घेतला. “माझं मत असं आहे की जो कायदा आहे, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. कुणीतरी कोर्टात गेलं आणि त्याला दिलासाही मिळाला नाही, तरीही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, हे चुकीचं आहे.”
“नाराजी प्रक्रियेवर, आयोगावर नाही”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांची नाराजी निवडणूक आयोगावर नसून कायदेशीर प्रक्रियेवर आहे. केवळ 24 ठिकाणी निवडणूक होणं बाकी असताना, सगळीच्या सगळी मतमोजणी पुढे ढकलणं हे त्यांना योग्य वाटत नाही.


