
Sanjay Raut On Devendra Fadnavis : ‘पत्रकार परिषदेला जागा नसेल तर शिवसेना भवन देऊ, चहापानाचा खर्च आम्ही करू’
मुंबई :- मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे समाजात निर्माण झालेल्या अशांततेवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, “या विषयावर लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या शंका आणि प्रश्नांना पुराव्यासह उत्तर द्यायला पाहिजे. ते फक्त जाता-येता एखादी कॉमेंट पास करतात.”
‘मोदींप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नका’; राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राऊत पुढे म्हणाले, “तुमच्या पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ. सर्व चहापान आम्ही करू. महाराष्ट्रात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाले आहे, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा.”
समोरासमोर चर्चा करा
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राऊत यांनी एक उपायही सुचवला आहे. “मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यावी आणि त्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही बोलवावे. समोरासमोर चर्चा होऊ द्या. तरच महाराष्ट्रात शांतता नांदेल,” असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘पंतप्रधान मोदींप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नका’ असा टोलाही लगावला.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरही टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ईशान्य भारतातील दौऱ्याबद्दल विचारले असता, राऊत यांनी त्यांच्यावरही टीका केली. “त्यांच्या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष नाही. मणिपूरमध्येच त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे. काही गोष्टींवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे उपक्रम साजरे केले जातात,” असे राऊत म्हणाले. “जेव्हा मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा ते कुठे होते? तेव्हा तोंड उघडले नाही, आता कशाला? हे सर्व ढोंग आहे,” असे म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.


