Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्रात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

Maharashtra Cabinet Meeting Latest News : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे सूचक विधान
मुंबई :- मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ‘ओला दुष्काळ’ (Wet Drought) जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही याबाबत सूचक विधान केले आहे. Maharashtra Cabinet Meeting Latest News
कृषीमंत्री आणि मदत मंत्र्यांचे संकेत
पत्रकारांशी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.” तसेच, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याच्या मागणीवर थेट भाष्य करणे टाळत ते म्हणाले की, “कोणतीही मागणी करताना निकष पाहणे महत्त्वाचे असते, पण शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका आहे.” नांदेड, यवतमाळ, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून, राज्यात एकूण ७० हजार एकर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. Wet Drought in Maharashtra
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याच्या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात योग्य विचारविनिमय करून लवकरच निर्णय घेतला जाईल.”
आतापर्यंत 2200 कोटींची मदत
मकरंद पाटील यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत केलेल्या मदतीची माहितीही दिली. जुलैपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी, तर ऑगस्टमध्ये पुणे, नागपूर आणि अमरावती विभागांना मोठी मदत देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोकणासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व मिळून सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याबाबत मोठा निर्णय अपेक्षित असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Wet Drought in Maharashtra



