Navi Mumbai Crime News : 14 वर्षांपासून फरार असलेला खुनाचा आरोपी अखेर जेरबंद!
•NATGRID पोर्टल, डेटा विश्लेषण आणि सापळा यामुळे खटल्यातील ‘गायब’ आरोपी अखेर अडकला

नवी मुंबई | 14 वर्षांपूर्वी 1000 रुपयांच्या वादातून आपल्या सहकाऱ्याचा खून करून फरार झालेल्या खुनी आरोपीला अखेर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तांत्रिक माहितीचा कुशल वापर करत, NATGRID पोर्टलच्या साहाय्याने आरोपीचं ठिकाण शोधून त्याला पुण्यातून अटक केली आहे. ही कारवाई म्हणजे गुन्हेगारीवर पोलिसांनी मिळवलेला निर्णायक विजय ठरतो आहे.
26 नोव्हेंबर 2011 रोजी वाशी सेक्टर 19 (एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत) घडलेल्या खुनाच्या घटनेने एकेकाळी नवी मुंबई हादरली होती. आजीनाथ त्रंबक दौड या ट्रक क्लीनरवर त्याचाच सहकारी लक्ष्मण गंगाधर काकडे याने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत खून केला होता. केवळ 1000 रुपयांच्या वादावरून रागाच्या भरात घेतलेला जीव – आणि त्यानंतर सुरू झाला 14 वर्षांचा फराराचा खेळ.
दरम्यान आरोपीचा पत्ता सापडत नसल्यामुळे 2015 मध्ये त्याच्याविरोधात CRPC 299 अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या, गुंतागुंतीच्या आणि अर्धवट राहिलेल्या खटल्यांचा तपास पुन्हा सुरू केला.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे आणि उपायुक्त अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी NATGRID पोर्टल, तांत्रिक विश्लेषण आणि अनेक संस्थांकडून गोळा केलेली माहिती यांचा संगम करून लक्ष्मण काकडे पुणे जिल्ह्यातील खेड येथे लपून बसल्याचं शोधून काढलं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार अनिल यादव, पोलीस शिपाई नवनाथ पाटील यांनी खेड येथे सापळा लावला आणि आरोपीस रंगेहाथ अटक केली. गुन्हा घडल्यानंतर 14 वर्षांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.


