
Eknath Shinde On Sanjay Raut : मुंबईसह राज्यातील शहरांमधील अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर झाली चर्चा; उद्या देवेंद्र फडणवीसांचीही घेणार भेट
मुंबई | राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे बदलत असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, राज ठाकरे यांनी स्वतः या भेटीचे मुख्य कारण स्पष्ट करत “प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही,” असे ठणकावून सांगितले आहे.
भेटीचा मुख्य अजेंडा: अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडी
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ही भेट केवळ राजकीय नव्हती. मुंबईसह पुणे, नाशिक आणि इतर वेगाने वाढणाऱ्या शहरांमधील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
राज ठाकरे म्हणाले की,”आपल्याकडे रस्ते आणि फ्लायओव्हर्स होणे चांगली गोष्ट आहे, पण आपण मूळ प्रश्नाला हात घालत नाही. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विकासकामांचा (Development) सर्वसामान्यांना त्रास होतोय. अनेक इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही, लोक रस्त्यावर गाड्या लावतात. याच विषयावर मी शिंदेंची भेट घेतली. उद्या मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.”
यापूर्वीही राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा एकनाथ शिंदेंनी तातडीने पालिका आयुक्त भूषण गगराणींना यावर काम करण्याचे निर्देश दिले होते, अशी आठवणही राज ठाकरेंनी यावेळी करून दिली.
निवडणुका संपल्या, आता कामाचे बोला: राज ठाकरे
“निवडणुका आता संपल्या आहेत, पूर्वीसारखे राजकारण राहिलेले नाही. जर राज्यासाठी काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील, तर सरकारची भेट घ्यावीच लागते,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीकाकारांना उत्तर दिले.
संजय राऊतांची जहरी टीका; “हे नंदनवन बेईमानीतून उभं राहिलंय”
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर विचारले असता, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला. “कोण कोणाला भेटतंय याची आम्ही हेरगिरी करत नाही,” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आमचं टोकाचं भांडण आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून बेईमानी केली. त्यांचे हे ‘नंदनवन’ (बंगला) बेईमानीच्या पायावर उभे राहिले आहे. मोदी आणि शाहांच्या इशाऱ्यावरून त्यांनी पक्षाशी गद्दारी केली.”


