
ICC Women World Cup Winner : फडणवीस सरकारच्या तिन्ही शिलेदारांना प्रत्येकी सव्वा दोन कोटी; मुख्यमंत्र्यांकडून ‘टीम स्पिरिट’चे कौतुक
मुंबई :- भारताच्या महिला क्रिकेट संघाने ICC Women’s Cricket World Cup 2025 मध्ये विजय मिळवून देशाला पहिले महिला क्रिकेट विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि या अभूतपूर्व यशात महाराष्ट्राच्या तीन कन्यांनी सिंहाचा वाटा उचलला. या तिन्ही विश्वविजेत्या खेळाडूंचा आणि सपोर्ट स्टाफचा आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला.




आर्थिक सन्मानाचा वर्षाव
महाराष्ट्र सरकारने या यशाची दखल घेत तिन्ही खेळाडू, उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा विशेष गौरव केला. या तिघींना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच, मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.50 लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, माजी क्रिकेटपटू पद्मश्री डायना एडलजी आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ (ॲनालिस्ट, लॉजिस्टिक टीम) साठी प्रत्येकी 11 लाख रुपयांची घोषणा केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला क्रिकेटपटूंचा सार्थ अभिमान व्यक्त केला. “महिला क्रिकेट वर्ल्ड कप नेहमी ठराविक देशांकडेच राहायचा. पहिल्यांदाच हा मानाचा कप नवीन देशाकडे, म्हणजे भारताकडे आला आहे, याची जगाने दखल घेतली आहे. हा विजय फक्त खेळाडूंचा नाही, तर संपूर्ण टीम आणि महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात जी आनंदाची लाट उसळली आहे, ती तुम्हीच दिली,” असे ते म्हणाले. “टीम स्पिरिट आणि बाँडिंग हेच यशाचे खरे गमक आहे,” असे सांगत त्यांनी संपूर्ण संघाची प्रशंसा केली.
जेमिमा रॉड्रिग्जच्या वडिलांनी उपांत्य फेरीत जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या नाबाद 127 धावांच्या ‘स्वप्नवत’ खेळीचा उल्लेख करताना त्यांचे डोळे पाणावले. स्मृती मंधानाने प्रतिक्रिया दिली की, “हा विश्वचषक महाराष्ट्राच्या मैदानावर जिंकला, त्यामुळं हा सन्मान आमच्यासाठी खूपच खास आहे.”
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


