
Rakhi Jadhav Joined BJP : जागावाटपा’वरून नाराजीचा स्फोट; 52 जागांची मागणी नाकारल्याने सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय नेत्याचा भाजपला साथ
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत शरद पवार Sharad Pawar गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचा मुंबईतील प्रमुख चेहरा आणि जिल्हा अध्यक्ष राखी जाधव Rakhi Jadhav यांनी सोमवारी आमदार पराग शाह Parag Shah यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. जागावाटपात पक्षाला मिळणाऱ्या अत्यल्प जागा आणि कार्यकर्त्यांच्या भविष्याबाबत पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्या प्रचंड नाराज आहेत.



नाराजीचे मुख्य कारण: 52 विरुद्ध 10!
राखी जाधव यांनी मुंबईसाठी 52 इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली होती आणि किमान 30 जागा मिळाव्यात असा त्यांचा आग्रह होता. मात्र, ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) युतीमुळे शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ 5 ते 10 जागा येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे पक्षासाठी अनेक वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नसल्याने जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
घाटकोपरमधून भाजपची उमेदवारी निश्चित?
राखी जाधव या घाटकोपरमधून सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेत्याही होत्या. भाजप प्रवेशानंतर त्यांना घाटकोपरमधील त्यांच्या हक्काच्या वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, यामुळे भाजपमधील स्थानिक इच्छुकांमध्ये बंडाळी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कठीण काळात सांभाळली होती धुरा
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाची वाट धरल्यानंतर, मुंबईत शरद पवार गटाची संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली होती. अशा कठीण काळात राखी जाधव यांनी मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि पक्षाला ऊर्जस्वित केले. सुप्रिया सुळे यांच्या त्या अत्यंत जवळच्या मानल्या जात होत्या, त्यामुळे त्यांचा पक्षत्याग पवारांसाठी वैयक्तिकरित्याही मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या गोटात शुकशुकाट
राखी जाधव यांच्यासोबतच इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि अजित पवार गटाची वाट धरली आहे. धनंजय पिसाळ, मनीष दुबे यांच्यानंतर आता खुद्द जिल्हा अध्यक्षांनीच पक्ष सोडल्यामुळे मुंबईत शरद पवार गटासमोर नेतृत्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे.



