Sanjay Raut : मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र रस्त्याव,हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा

“मराठी स्वाभिमानासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत” – संजय राऊत
मुंबई | राज्य सरकारच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट) देखील सहभागी होणार आहे.
शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मराठी अस्मिता आणि मुंबईच्या संरक्षणासाठी ही वेळ निर्णायक आहे,” असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले, “पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन लढा दिला होता. आज पुन्हा तसाच प्रसंग ओढवला आहे. मुंबई आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या धोरणांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे.”
या मोर्चासाठी महाविकास आघाडीसह सर्व पक्ष व संघटनांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हिंदीच्या सक्तीविरोधात भूमिका घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.
“हा लढा फक्त राजकीय नाही, तर तो मराठी अस्मिता आणि ओळखीचा लढा आहे. म्हणूनच सर्वांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र यावं,” असे आवाहन राज व उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी बांधवांना केले आहे.


