मुंबई

Supriya Sule on Devendra Fadnavis : “महाराष्ट्राच्या लौकिकास न शोभणारे!” – मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या हाणामारींवर सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

•”छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे कसे घडले?”; लोकशाही मूल्यांना गालबोट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात 2 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या तुंबळ हाणामारींच्या घटनांवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. महाराष्ट्राच्या लोकशाही मूल्यांच्या परंपरेला हे शोभणारे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशाला दिशा दाखविणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात या घटना घडूच कशा शकतात, अशी खेदाची भावना मनात आहे. सशक्त लोकशाही असणाऱ्या आणि संविधानात्मक विचारांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान तुंबळ हाणामाऱ्या होणे हे सर्वथा अयोग्य, अनुचित आणि राज्याच्या लौकिकास न शोभणारे आहे.

पत्रातील प्रमुख मुद्दे

वेदनेची भावना: “देशाला दिशा दाखविणारे राज्य अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील निवडणुकीची ही धक्कादायक परिस्थिती पाहून मनाला अतिशय दुःख आणि वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्रात हे घडूच कसे शकते, अशी भावना याक्षणी माझ्या मनात आहे.”

महाराष्ट्राचा वारसा: महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. या भूमीने सदैव लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला आहे. अशा प्रबोधनात्मक परंपरेच्या राज्यात निवडणुकीदरम्यान अशा हाणामारी होणे सर्वथा अयोग्य आणि राज्याच्या लौकिकास न शोभणारे आहे.

निवडणूक आयोगावर नाराजी: निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या निवडणूक आयोगाने या हाणामारींच्या घटनांवर कसलीही कारवाई केली नाही, याबद्दल सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली. आयोगाने स्वतःहून दखल घेऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राजकारणाचा घसरता स्तर: “राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चाललेला असून, पुढच्या पिढ्यांसाठी आपण कसला वारसा सोडून जाणार आहोत, असा प्रश्न यानिमित्ताने राज्यातील जनतेला पडला आहे.”

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्यामुळे राज्याची परंपरा, मूल्ये आणि प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0