Supriya Sule : ईव्हीएमवरील प्रश्नांवरून ‘पवार’ गटातच मतभेद? – “ईव्हीएमवर सवाल करणार नाही, कारण मी याच मशीनमुळे चार वेळा खासदार झाले”

•लोकसभेत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकारी अध्यक्षांचे मोठे विधान; ‘इंडिया’ आघाडीच्या बॅलेट पेपरच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सुळेंची भूमिका लक्षवेधी; भाजपवर व्यक्त केल्या अपेक्षा
मुंबई/दिल्ली :- देशभरात ‘इंडिया’ आघाडीकडून आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम (EVM) मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी जोर धरत असताना, याच आघाडीतील महत्त्वाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठे आणि विरोधी विधान केले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा असलेल्या सुळे यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, “मी ईव्हीएमवर सवाल करणार नाही, कारण याच मशीनमुळे मी चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे.”
निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेवर लोकसभेत चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली.
सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट मत
“मी याच मशीनमुळे निवडून आले आहे. त्यामुळे मी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. मी मशीनच्या विरोधात बोलत नाहीये, मी एक अत्यंत मर्यादित गोष्ट मांडत आहे.
राजकीय पार्श्वभूमी
सुप्रिया सुळे यांनी 2009, 2014, 2019 आणि जून 2024 अशा चार वेळा लोकसभेवर विजय मिळवला आहे. विशेषतः 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना, बारामतीच्या हाय-व्होल्टेज लढतीत त्यांनी आपले चुलत बंधू अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठा पराभव केला होता.
ईव्हीएमवरील ‘इंडिया’ आघाडीचा विरोध
याउलट, ‘इंडिया’ आघाडीचा ईव्हीएमला तीव्र विरोध आहे. मतमोजणीतील तफावतीमुळे ईव्हीएम हॅक केले जात असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मोठा मोर्चाही काढला होता, ज्यात सुप्रिया सुळे यांचा पक्षही सहभागी झाला होता.
सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे ‘ईव्हीएमच्या मुद्द्यावर जिंकल्यावर भूमिका बदलणे’ असा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला बळ मिळाले असून, ‘इंडिया’ आघाडीतील त्यांच्याच पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



