मुंबई

Shinde Vs Thackeray : नारळी पौर्णिमेनंतर शिंदे-आदित्य ठाकरे पुन्हा आमनेसामने? बीडीडी चाळ घरवाटप कार्यक्रमाला तणावाची पार्श्वभूमी

•म्हाडाच्या 556 घरांच्या चावीवाटप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित; स्थानिक आमदार आदित्य ठाकरेलाही निमंत्रण

मुंबई :- वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या थेट आमनेसामन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी पुन्हा एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमी मात्र यावेळीही राजकीय तणावाचीच आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचे चावीवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार असून स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार, यावेळी ठाकरे यांना बोलण्याची संधी दिली जाणार नाही.

बीडीडी चाळ पुनर्विकास हा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळालेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ते नियमितपणे पाहणी करून रहिवाशांच्या मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील होते. त्यामुळे पहिल्या 556 घरांचा ताबा देण्याचा क्षण त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. अशा वेळी भाषणाची संधी न मिळाल्यास ते कार्यक्रमास हजेरी लावतील का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यापूर्वी नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अचानक आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने वातावरण तापले होते. ठाकरे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. तीच घटना ताजी असताना आता उद्या होणाऱ्या मंचावरील संभाव्य पुनर्भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts