
Sharad Pawar On Mumbai Railway Accident : शरद पवार यांची तीव्र प्रतिक्रिया; रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
मुंबई :- मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी घडलेली दुर्घटना अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर आघात करणारी ठरली. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून जात असताना दरवाज्यात लटकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळांवर फेकले गेले. या भीषण घटनेत 13 प्रवासी खाली पडले असून, त्यापैकी 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. उर्वरित जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Sharad Pawar On Mumbai Railway Accident
घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना जखमींसाठी प्रार्थना केली असून, लोकलमधील वाढती गर्दी हीच अशा अपघातांची मुळ कारणं असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.
शरद पवार यांनी पोस्ट म्हटले आहे की,मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.
केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.


