संजय राऊतांचा मोठा दावा: ‘दिल्लीत अमित शाहांच्या हाती रिमोट कंट्रोल, मंत्रिमंडळाची होणार सफाई’

Sanjay Raut On Maharashtra Government : ‘भ्रष्टाचार, घोटाळे यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन; फडणवीसांवर ओझे’ – राऊतांचा घणाघात
मुंबई: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचे नियंत्रण आता मुख्यमंत्र्यांऐवजी दिल्लीतील अमित शाहांच्या हाती आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी मंत्रिमंडळातील सध्याच्या गोंधळाच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या वातावरणावर मार्ग काढणे हाच त्यांचा मुख्य हेतू होता, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी काही दिवसांपासून चार मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जाणार असल्याचा दावा करत होते. आता त्यांनी त्यात आणखी काही नावांची भर घातली आहे. “संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय राठोड आणि आता योगेश कदम यांची नावे यात जोडली गेली आहेत. आणखीही काही नावे समोर येत आहेत,” असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, केवळ चारच मंत्र्यांना नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचीच ‘सफाई’ करून नव्या चेहऱ्यांचे मंत्रिमंडळ आणावे, अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
भ्रष्टाचार, शेतकरीविरोधी विधाने, लेडीज बार प्रकरणांपासून ते विविध घोटाळे आणि ‘पैशांच्या उघड्या बॅगा’ यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे ओझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेले आहे, पण त्यांना ते फेकताही येत नाही, अशी परिस्थिती झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “ज्यांच्याकडे 137 चे संख्याबळ आहे, त्यांना अशा ओझ्यामुळे वाकण्याची गरज नाही. पण तरीही ते वाकत आहेत,” असे म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.



