मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “भाजपची परवानगी घेण्याचा प्रश्नच कुठे येतो?” संजय राऊतांचा प्रफुल पटेलांवर हल्लाबोल; विलीनीकरणाच्या वादात मोठी तोफ डागली!

Sanjay Raut On Prafull Patel : अजितदादांनी विचार खुंटीला टांगले नव्हते; मोदी-फडणवीसांना प्रत्येक गोष्ट का सांगायची? राऊतांचा सवाल

मुंबई | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून सुरू असलेल्या वादात आता शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. “अजित पवार भाजपसोबत गेले असले, तरी त्यांनी आपले विचार कधीही खुंटीला टांगले नाहीत. ते स्वतःचा पक्ष सक्षमपणे चालवत होते, त्यामुळे त्यांना भाजपची किंवा देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेण्याची गरज नव्हती,” अशा कडक शब्दांत राऊत यांनी प्रफुल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला.

प्रफुल पटेलांवर बोचरी टीका

विलीनीकरणाच्या चर्चेवरून प्रफुल पटेल यांनी व्यक्त केलेल्या संतापावर संजय राऊत यांनी त्यांना सुनावले. “अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा नाही. प्रफुल पटेल हे केवळ मोदी-शहांचे भक्त आहेत. पटेलांना पवार कुटुंबाचा ‘मुखिया’ कोणी केले? त्यांनी चिडचिड करू नये,” असे राऊत म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांची स्थापना अमित शहा यांनी केली असून निवडणूक आयोग ही त्यांची ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

“मोदी-फडणवीसांना प्रत्येक गोष्ट का सांगायची?”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत यांनी विचारले की, “दोन पक्षात (शरद पवार आणि अजित पवार) काही चर्चा झाली असेल, तर ती फडणवीस किंवा मोदींना का सांगितली पाहिजे? हा कसला अनाठायी हट्ट आहे? प्रत्येक गोष्टीसाठी भाजपची परवानगी घेण्याची पद्धत अजितदादांची नव्हती.”

भारत-अमेरिका व्यापार करारावर तोफ डागली

केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही जोरदार टीका केली. नुकत्याच झालेल्या भारत-अमेरिका व्यापार करारावरून त्यांनी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना लक्ष्य केले. “पंतप्रधान मोदींनी भारताचे सार्वभौमत्व ट्रम्प यांच्या पायाशी गहाण ठेवले आहे. पीयूष गोयल खोटं बोलत असून या करारामुळे भारतीय शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आपलं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण आता ट्रम्प ठरवत आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

चंद्रपूरमधील तिढा आणि उद्धव ठाकरेंचे संकेत

चंद्रपूर महापालिकेतील महापौर निवडीच्या पेचावर बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि उबाठा यांच्यात समन्वय राहील आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0